जिल्हा गुंतवणूक परिषदे अंतर्गत पालघर जिल्ह्यात 250 उद्योगांचे 15 हजार कोटींचे सामंजस्य करार…!

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :-पालघर दिनांक ६ मार्च२०२४ : विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद टीमा हॉल, बोईसर, पालघर येथे संपन्न झाली.

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2024 साठीची पूर्व तयारी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदे अंतर्गत पालघर जिल्ह्यात छोटया उद्योजकांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत तसेच बाजूच्या राज्यांतील उद्योजकांनीही गुंतवणुक करण्याकरिता पुढाकार घेतला. परिषदेमध्ये एकूण 250 प्रस्तावित उद्योगातून 15000 कोटी रुपये एवढ्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात येत आहेत. या गुंतवणुकीतून पालघर जिल्ह्यात 25000 नवीन रोजगार निर्मिती होणार आहे.

सदर परिषदेला संबोधित करत असताना जिल्हाधिकारी श्री.बोडके यांनी सांगितले की पालघर जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण निर्मिती करण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे उद्योगांना कोणतीही मदत आवश्यक असल्यास जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असेल.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.बोडके आणि उद्योग सह संचालक, कोकण विभाग यांनी सामज्यस्य करार करण्यात येणा-या उद्योजकांचे स्वागत व अभिनंदन केले.

कोकण विभागाच्या सह संचालक विजू सिरसाठ यांनी गुंतवणुक परिषद आयोजनाबाबतची भूमिका व उद्देश याची माहिती देताना जिल्हास्तरावर गुंतवणुक आकर्षित करणे, गुंतवणुकदार आणि व्यवसायांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करुन देणे आणि जिल्हयांना केंद्रबिंदु मानून जिल्हयाच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश असल्याचे सांगितले. या परिषदे अंतर्गत गुंतवणुक आकर्षित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या सामंज्यस्य कराराच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना उद्योग विभाग, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आवश्यक परवानग्या व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक टप्यावर मदत करण्यात येणार आहे. तसेच उद्योग विभागाच्या विविध पुढाकारांबाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले. नजीकच्या काळात संपन्न झालेल्या महा-डिफेन्स एक्स्पो, राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार, इग्नाईट महाराष्ट्र इत्यादी कार्यक्रमांची माहिती उपस्थित उद्योजकांना दिली. तसेच समूह विकास योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मीती योजना, उद्योग धोरण इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.

तसेच उद्योग विभागाकडून उद्योजकांना शासनाच्या विविध योजनांतर्गत फायदा घेण्याबाबत मार्गदर्शन व वेळोवेळी सहाय्य करण्यात येत असल्याचे आवर्जून सांगितले. जिल्हा उद्योग केंद्र पालघरचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे यांनी महाराष्ट्र पॉलिसी लैंडस्केप बाबत सादरीकरण केले. लालबहादूर कटारे, सह आयुक्त, राज्य वस्तू व सेवा कर व मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाच्या मैत्री कायदा, इज ऑफ डुईंग बिजनेस व एक खिडकी योजना याबाबत सादरीकरणे केले. या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदे मध्ये नरेश देवराज, सह संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, दिनेश पाटील, सहाय्यक आयुक्त, मस्त्य व्यवसाय, मुकेश लांजेवार, उप अभियंता एम.आय.डी.सी. कुमार परमार, संचालक , सेंट जॉन कॉलेज, प्रवीण खानविलकर, अध्यक्ष, औद्योगिक सहकारी वसाहत पालघर, रवींद्र ठाकूर, उपाध्यक्ष टीमा संघटना, विक्रांत पाटील, जिल्हा अग्रणी बँक, प्रणव झुंजारराव, वरिष्ठ सल्लागार इ. वाय. टीम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या परिषदे मध्ये विराज प्रोफाइल (8050 कोटी), एस. एस. पी. एंटरटेनमेंट वर्ल्ड एल. एल. पी. (200 कोटी), लॅक्सोन स्टील लिमिटेड (250 कोटी), छेडा फूड्स (200 कोटी), आरती ड्रग्स लिमिटेड (150 कोटी), डी डेकोर (100 कोटी), दमानी कास्टिंग (100 कोटी), विस्तार अलोय्ज (50 कोटी), रोहन फूड इंडस्ट्री (30 कोटी), पालघर फर्नीचर क्लस्टर (20 कोटी), बी. आय. सी. केमिकल्स (20 कोटी), आरे पॅकेजिंग (5 कोटी), ग्रीन फॉईल ऍग्रो (1 कोटी) इत्यादी उद्योगांशी प्रातिनिधिक स्वरूपात सामंजस्य करार करण्यात आले.

या गुंतवणुक परिषदेच्या माध्यमातून जिल्हयात येत असलेल्या प्रस्तावित गुंतवणूक लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरण्याची आशा उद्योग क्षेत्रातील सर्व स्तरांमधून करण्यात येत आहे. श्री. खिराळे, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र पालघर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट