सहकार भारतीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आयोजित पतसंस्था प्रशिक्षण कार्यक्रमाचा यशस्वी समारोप…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.
सहकार भारतीच्या स्थापना दिनानिमित्त, दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी पालघर येथील शिक्षक पतपेढी भवनात सहकार भारती पालघर जिल्हा (प), उपनिबंधक पालघर जिल्हा, सहाय्यक निबंधक पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पतसंस्था प्रकोष्ठ प्रायोजित पतसंस्था प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सहकार गीताने करण्यात आली. त्यानंतर सहकार भारतीच्या माजी अध्यक्षा श्रीमती शशीताई अहिर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पूर्वा ताई सावंत यांनी सहकार भारतीची कार्यपद्धती आणि संस्थेच्या व्यापक कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सहकार भारती कशा प्रकारे कार्य करते आणि संस्थेची आजची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर श्री. कुलकर्णी सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. तानाजी कवडे यांनी आदर्श लेखापरीक्षण अहवाल, वसुली व्यवस्थापन तंत्र, CRAR, आणि पतसंस्था गुणपत्रिका या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. श्री. गुजराथी सरांनी पतसंस्था कशा पारदर्शक होऊ शकतात यावर प्रखर मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी एकूण २५ पतसंस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख सौ. कौमुदी काळे यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केले.
महामंत्री श्री. नितीन वझे यांनी कार्यक्रमाचे समारोप करताना सहकार भारतीने पतसंस्था प्रशिक्षण का आयोजित केले, त्याचे महत्त्व आणि त्याचा पतसंस्थांना होणारा लाभ यावर प्रकाश टाकला. तसेच, शशीताई अहिरेंच्या स्मृतींना आदरांजली वाहून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.







कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव श्री. संकेत कुडू, श्री. अनंत काका कुडू, श्री. हेमंत पाटील, श्री. मंगेश उईके, श्री. मनीष कांबळी, श्री. किसन किणी, सौ. मनीषा राऊत, सौ. हर्षदा तरे, सौ. मीनल वैद्य, सौ. आदिती काळे, सौ. सुजाता पागधरे आणि इतर सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाला एकूण ११३ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते, ज्यामुळे हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी आणि फलदायी ठरला.