पालघर जिल्हा बाल कामगार मुक्त करण्यासाठी जनजागृती करावी -जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड

उपसंपादक – मंगेश उईके
पालघर,


दि. ९ : पालघर जिल्ह्यातून बाल कामगार प्रथा संपवून ‘बाल कामगार मुक्त जिल्हा’ करण्यासाठी संबंधित विभागांनी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी तसेच विविध खाजगी आस्थापनावर धाडी टाकाव्या असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक संपन्न झाली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, कामगार उप आयुक्त विजय चौधरी तसेच जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीचे सदस्य उपस्थित होते.
बाल कामगार कृती दल समिती , जिल्हास्तरीय वेठबिगार दक्षता समिती, जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती (प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना , व लघु व्यापाऱ्यांकरीता राष्ट्रीय निवृत्ती योजना , जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती ( ई –श्रम पोर्टल वरील नोंदणी), जिल्हास्तरीय समन्वय समिती, जिल्हास्तरीय ई– श्रम पोर्टल दावे देखरेख व आढावा समिती, जिल्हास्तरीय कार्यकारी समिती तसेच असंघटित कामगारांसाठीच्या विविध समितींचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी घेतला.
पालघर जिल्ह्यात आढळून आलेले तसेच पालघर जिल्ह्याचे रहिवासी असलेले वेठबिगार कामगारांना तात्काळ आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करावे तसेच जास्तीत जास्त असंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले.
विविध शासकीय विभाग, शाळा, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग घेऊन बालकामगारांविरोधात व्यापक जनप्रबोधन राबवावे. बाल कामगार प्रथेला कायमचा आळा बसवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिक ,प्रशासन, शिक्षक, पालक आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास पालघर जिल्हा बाल कामगार मुक्त होऊ शकतो . असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.