*कोकणाचा जलदगतीने विकास करण्यासाठी रस्ते, महामार्ग उभारणार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

0
Spread the love

प्रतिनिधी:-सचिन पवार
माणगांव रायगड

माणगांव – नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध कोकणाचा जलदगतीने विकास व्हावा यासाठी रस्ते व महामार्ग उभारून प्रवासाचा वेग कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहॆ. प्रवासाचा वेग कमी करण्याची गरज लक्षात घेऊन मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करणे, मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता बरोबरच अनेक रस्त्यांची उभारणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कुल माणगाव च्या नवीन इमारतीचे उदघाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, रोहयो मंत्री भरत गोगावले, खा. सुनील तटकरे, आ. महेंद्र दळवी, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, माणगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड राजीव साबळे, संचालक अनिकेत तटकरे यांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कोकणातील विकासाला गती देण्यासाठी येथील प्रवासाचा कालावधी कमी करण्याची गरज आहॆ. यासाठी राज्य शासनाने
कोस्टल महामार्गावरील ९ खाडी पुलांचे काम सुरू केले आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई गोवा महामार्ग वर माणगाव येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी माणगाव बायपासचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल. कोकणातील लोकांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठे प्रकल्प या ठिकाणी उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासन अनेक लोकांभिमुख प्रकल्प राबवून विकासाला चालना देत असल्याचेही श्री शिंदे यांनी सांगितले. राज्य शासनामार्फत महिला सक्षमकरणासाठी सुरु करण्यात आलेली लाडकी बहीण योजना किती ही अडचणी आल्या तरी बंद करण्यात येणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाने सीबीएसई शाळा सुरु करून ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे ही कौतुकास्पद बाब आहॆ. या शाळेला मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे यांचे नाव दिले याचा विलक्षण आनंद आहॆ. मातोश्री गंगुबाई या शिक्षणासाठी खुप आग्रही होत्या. परिस्थिती मुळे मी शिक्षण घेऊ शकलो नव्हतो. परंतु नंतरच्या आयुष्यात मी पदवी आणि पुढील शिक्षण घेतले. तसेच मुलगा उच्चविद्याविभुषित आहॆ याचे समाधान असल्याचेही श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य आणि शिक्षण ही दोन्ही महत्वाची खाती आवर्जून स्वतः कडे घेतली असून त्या माध्यमातून अनेक लोकांभिमुख निर्णय घेण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.मराठीचा सन्मान राखायलाच हवा, मात्र जागतिक स्पर्धेला तोंड द्यायचे तर इंग्रजी देखील यायला हवे, त्याच दृष्टिकोनातून पालकांची मागणी पूर्ण करण्यासाठी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळामार्फत ही सीबीएसई शाळा सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भविष्यात या शाळेतून अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडावेत अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी माणगाव शिक्षण प्रसारक संस्थेच्या कामाचा आढावा घेऊन संस्थेच्यापुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.खा. सुनील तटकरे यांनी संस्थेने
माणगावात विविध शैक्षणिक दालने सुरू करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सर्व सामान्य आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना माणगावातच उच्च शिक्षण घेता येत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष ऍड राजीव साबळे यांनी केले. कार्यक्रमाला शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर, पदाधिकारी, पालक, शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *