पालघर जिल्ह्यातील बालकांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य व पाणी पुरवठा विषयक कामांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे-वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर ;
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न





पालघर,दि.05-. पालघर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करत असतांना जिल्ह्यातील बालकांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य व पाणी पुरवठा विषयक कामांना प्रथम प्राधान्य देऊन पालघर जिल्हयातील सर्व कार्यालयीन यंत्रणांनी लोकोपयोगी कामे तातडीने करावीत अशा सूचना वनेमंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी संबंधित शासकीय अधिकारी यांना सुचना दिल्या.
वनेमंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज सकाळी 11.00 वाजता लोकशाहिर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे संपन्न झाली. सदर बैठकीस जि. प. अध्यक्ष प्रकाश निकम, खा. सुरेश म्हात्रे आ. ॲड. निरंजन डावखरे,आ. राजेंद्र गावित, आ.दौलत दरोडा,
आ.विलास तरे, आ.विनोद निकोले, आ.हरिश्चंद्र भोये, आ.स्नेहा दुबे-पंडित, आ. राजन नाईक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर, वसई-विरार मधुकर पाण्डेय , अति. आयुक्त MMRDA राधाबिनोद शर्मा, जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार, प्रकल्प अधिकारी डहाणू सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी जव्हार करिश्मा नायर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये दि. 18 जुलै 2024 व दि. 27 जुलै 2024 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, विशेष घटक योजना व आदिवासी घटक कार्यक्रम सन 2024-25 चा माहे जानेवारी, 2025 अखेर खर्चाचा आढावा घेण्यात आला. सन 2024-25 अंतर्गत अनुक्रमे रु. 345.00 कोटी, रु. 14.00 कोटी, रु.329.50 कोटी असा एकूण रु. 688.50 कोटी निधी अर्थसंकल्पित झाला असून एकूण रु. 567.53 कोटीच्या प्रशासकिय मान्यता देण्यात आल्या आहेत. तसेच रु. 182.55 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. सन 2024-25 अंतर्गत उर्वरित निधी खर्च करण्यासंदर्भात पालकमंत्री गणेश नाईक यांनी यंत्रणांना निर्देश दिले आहेत.
तसेच जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, विशेष घटक योजना व आदिवासी घटक कार्यक्रम सन 2025-26 करिता अनुक्रमे रु.271.65 कोटी, रु.14.00 कोटी, रु. 410.43 कोटी असा एकूण रु. 696.08 कोटीची मर्यादा शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील विविध कार्यान्वयीन यंत्रणांकडून प्रस्ताव प्राप्त करून निधीच्या मर्यादेत आराखडा जिल्हा नियोजन समिती बैठकीत सादर करून आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच सर्वसाधारण योजनेंतर्गत रु.196.00 कोटी व आदिवासी उपयोजनेंतर्गत रु.72.83 कोटी असा एकूण रु.268.83 कोटी अतिरिक्त निधीची मागणी जिल्हा नियोजन समिती, पालघर मार्फत राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या निती आयोगा अंतर्गत आकांक्षित तालुका कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड हे चार तालुके समाविष्ट करण्यात आले असून, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 अंतर्गत प्रती तालुका रु.5.00 कोटी असा एकूण रु. 20.00 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून, सदर निधीच्या अनुषंगाने चारही तालुक्यांनी आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करून आराखड्यास मंजूरी देण्यात आली.
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्ह्यातील विविध यंत्रणांद्वारे कार्यान्वयीत वैयक्तिक लाभांच्या योजनेचे पुस्तक तयार करून सदर पुस्तीकेचे अनावरण करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती पालघर मार्फत महाराष्ट्रात प्रथमच वैयक्तिक लाभाच्या योजनांचे पुस्तक तयार करण्यात आले असून सर्व नागरिकांना विविध विभागांतर्गत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.