कल्याण परिमंडळ ३ मध्ये गांजाची मोठी पकड; तिघांना अटक २५ किलो गांजा, तंबाखू विक्रीवरही कारवाई

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
कल्याण ;


दिनांक २७ कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत अंमली पदार्थ व तंबाखूजन्य वस्तूंच्या विक्रीविरोधात जोरदार मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण यांच्या विशेष पथकाने व खडकपाडा पोलीस ठाण्याच्या मदतीने तीन आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केला आहे.
प्रकरण १: २५ किलो गांजासह एकजण ताब्यात
दि. २६ जून रोजी वालधुनी ब्रिजजवळ रेल्वे हॉस्पिटल शेजारी विशेष पथकाने गस्त दरम्यान एका रिक्षामधून प्रवास करणाऱ्या इसमाची तपासणी केली असता त्याच्याकडे २५ किलो गांजा (किंमत अंदाजे रु. ५,१७,२००/-) आढळून आला. आरोपीचे नाव अन्वर अहमद शेख (५६) असून तो टिटवाळा येथे राहणारा आहे. त्याच्यावर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरण २: शहाड येथे दोघांकडून ४ किलोपेक्षा अधिक गांजा जप्त
त्याच दिवशी खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत शहाड-मोहने रोड जवळ दोन युवक गांजा विक्रीसाठी उभे असताना पकडले गेले. रेहान हमीद शेख (२२) व इस्माईल अख्तर शेख (२५) असे त्यांचे नाव असून दोघेही जालना जिल्ह्यातील रांजणी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून ४ किलो १७७ ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे रु. ८२,०००/-) हस्तगत करण्यात आला असून त्यांच्यावर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवरही धडक कारवाई
अंमली दिनाचे औचित्य साधून परिमंडळातील सर्व पोलीस ठाण्यांनी शाळा आणि महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य वस्तू विक्री करणाऱ्यांविरोधात COPTA कायद्यानुसार १०५ केसेस दाखल केल्या आहेत.
ही कारवाई परिमंडळ ३ कल्याणच्या विशेष पथकाने आणि स्थानिक पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे केली असून भविष्यातही अशाप्रकारच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात कडक पावले उचलली जातील, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.