हरवलेल्या मुलाला पालकापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपणारा पोलीस..!

मुंबई :
सह संपादक – रणजित मस्के
‘‘पोलिस काका, माझ्या आईला आणा ना!’’ हा बालआश्रमात राहणाऱ्या पाचवर्षीय पीयूषचा प्रश्न ऐकून शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किसन हेमाजी आंबवणे यांचे काळीज पिळवटून निघाले. शेकडो गुन्हेगारांना पकडणारा हा संवेदनशील मनाचा पोलिस अधिकारी एका चिमुकल्याच्या आई-वडिलांच्या शोधात वर्षभरापासून रात्रंदिवस फिरतोय. कुठल्याही परिस्थितीत या मुलाला त्याच्या पालकांची भेट करून देण्याचा चंग या पोलिस अधिकाऱ्याने बांधला आहे.
८ फेब्रुवारी २०२४ रोजी गोवंडीच्या रफिकनगरमध्ये पाच वर्षांचा पीयूष रडत उभा होता. त्याला स्वतःचा पत्ता सांगता येत नव्हता. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेत आईवडिलांसंबधी चौकशी केली. ‘बाळ, तुझे नाव काय?’… त्याने सांगितले, ‘पीयूष.’ ‘आईचं नाव काय?’ याचे त्याला उत्तर देता आले नाही. ‘बाबाचे नाव?’ परत शांतता. मुलगा मराठी भाषा समजतोय आणि बोलतोय, म्हणजे तो मराठी कुटुंबातील असल्याचा अंदाज किसन आंबवणे यांनी लावला.
त्यांनी पीयूषला बस, लोकलचे फोटो दाखवले. तेव्हा त्याने लोकलने आल्याचे सांगितले. त्याच्या पालकांचा शोध घेण्यासाठी आंबवणे यांनी शिवाजीनगर, मानखुर्द, देवनार, छेडानगरपर्यंतची गल्लीबोळ पालथी घातली; मात्र माहिती मिळाली नाही. शेवटी बाल न्यायालयाच्या आदेशाने पीयूषला मानखुर्दच्या बालआश्रमात दाखल करण्यात आले. आंबवणे यांनी त्यांची शोधमोहीम मात्र थांबवली नाही.
मला पाहून हसतो, जाताना रडतो!गेल्या वर्षभरात शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत २० मुले हरवली होती. त्यापैकी पोलिसांनी १८ मुलांना त्यांच्या कुटुंबांकडे सुखरूप पोहोचवले. या मुलांमध्ये सर्वात लहान पीयूष आहे. नीट समजत नसल्यामुळे या मुलांमध्ये केवळ पीयूषच्या आईवडिलांचा पत्ता सापडला नाही. आंबवणे आणि त्यांचे सहकारी वारंवार बालआश्रमात जातात. प्रत्येक भेटीत पीयूष आनंदाने त्यांना भेटतो. आंबवणे परत जायला निघाले असता तो एकदम गुमसूम होतो. मग डोळ्यातून अश्रूंच्या धारा आपसूक सुरू होतात. त्याचे डोळे बघून माझे काळीज पिळवटून निघते. मला भावुक व्हायला होते व पीयूषला त्याच्या आई-वडिलापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार अधिक पक्का होतो, असे आंबवणे सांगतात.
स्वखर्चाने शोधमोहीम पीयूषच्या आई-वडिलांना शोधण्यासाठी आंबवणे यांनी स्वतःचे पैसे खर्च करून वृत्तपत्रात जाहिरात देण्याचा निर्णय घेतला.