जिल्ह्यात तारापूर येथे मॉक ड्रिल संपन्न

सह संपादक – रणजित मस्के
पालघर


पालघर दि. ०७ : केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले होते. त्याच अनुषंगाने युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून आज जिल्हा भरात विविध ठिकाणी एकाच वेळी मॉक ड्रील घेण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्यादृष्टीने सादर करण्यात आलेले विविध प्रात्यक्षिके देखील सर्वांनाच उपयोगी पडणार असल्याचे जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड म्हणाल्या.
केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मॉक ड्रिलच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, तहसिलदार, रमेश शेंडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ( NDRF ) टीम कमांडर सुरेंद्र पुनीया, बोईसर अग्निशमन दलाकडून श्री पाटील, उपनियंत्रक नागरी संरक्षण दल काशिनाथ कुरकुटे जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव, आदी उपस्थित होते. यावेळी तारापुर अणुऊर्जा प्रकल्प केंद्रीय संरक्षण दल, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरु युवा केंद्राच्यावतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे आणि काय करु नये याबाबतचे प्रात्यक्षिके देखील दाखविण्यात आले.