आणीबाणी काळातील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न..

पालघर
उपसंपादक -मंगेश उईके



आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या सन्मान धारकाचा शासनाने केला सन्मान
पालघर जिल्ह्यातील वीरांनी आणि वीरांगनानी लोकशाही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आणीबाणी काळात लढली
*......खासदार डॉ हेमंत सवरा*
पालघर दिनांक 25 : पहिली स्वातंत्र्याची लढाई ब्रिटिश साम्राज्य विरुद्ध लढून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्यानंतर संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना 25 जून 1975 रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली या आणीबाणीच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील वीरांनी आणि वीरांगनानी लोकशाही स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढली
असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी केले.
आणीबाणी लागू होऊन 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संविधान हत्या दिवस 2025 चे आयोजन जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे करण्यात आले
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.इंदू राणी जाखड , निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी महेश सागर पालघर तहसीलदार रमेश शेंडगे, तहसीलदार सचिन भालेराव, आणीबाणी विरोधी लढा देणारे पालघर जिल्ह्यातील वीर योद्धे , तसेच नागरिक उपस्थित होते
राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाही स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढणाऱ्या वीरांचा तसेच त्यांच्या वारसदारांचा सन्मान करण्यासाठी 2014 मध्ये स्तुत्य निर्णय घेतला होता. हा निर्णय 2019. पर्यंत चालू होता कालांतराने 2019 मध्ये तो बंद करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय पुन्हा घेतल्यामुळे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले
आणीबाणी का लागू केली गेली हा संशोधनाचा विषय राहिलेला नाही हुकूमशाही देशात परत आणण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली. यापूर्वी देशाने मुघल आणि इंग्रज राजवटीची हुकूमशाही पाहिली होती स्वातंत्र्यानंतर
25 जून 1975 रोजी देशाने पुन्हा हुकूमशाही अनुभवली साधारणपणे 21 महिने जोपर्यंत आणीबाणी काढली गेली नाही तोपर्यंत ती पूर्ण देशाने अनुभवली होती . या आणीबाणी काळामध्ये अनेक जणांना तुरुंगवास भोगाव लागला किशोरवयीन मुलांचाही समावेश होता संपूर्ण देशाला कारागृहामध्ये परावर्तित करण्याचे काम आणीबाणी काळात करण्यात आले. तसेच नागरिकावर अनेक जाचक निर्बंध लादण्यात आले. सरकार यंत्रणाचा गैरवापर करण्यात आला कुणीही सरकारच्या विरोधात बोलायचं नाही ,लिहायचं नाही प्रत्येकावर बंदी जो बोलेल त्याला तुरुंगवास अशा प्रकारचे चित्र संपूर्ण भारत देशात पहायला मिळत असल्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले
तत्कालीन पंतप्रधान यांनी 1971 ची निवडणूक लढवली आणि जिंकल्या त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली की ही निवडणूक लोकशाहीला धरून लढलेली नसून पैशांचा वापर करून तसेच सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून जिंकण्यात आली आहे
त्यामुळे त्यांची निवडणूक रद्दबदल करावी त्यांचं पद रद्द कराव अशी याचिका दाखल केली 12 जून 1975 ला उच्च न्यायालयाने निकाल दिला तत्कालीन पंतप्रधान यांना सांगितलं की तुमचा पदावर राहण्याचा संविधानिक अधिकार राहिलेला नाही पदावरून खाली व्हावे या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयातयाचिका दाखल केली आणि 24 जून 1975 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तो निर्णय अबाधित ठेवला . त्यानंतर तात्कालीन केंद्र सरकारने राष्ट्रपती मार्फत 25 जून 1975 रोजी संपूर्ण देशामध्ये आणीबाणीची घोषणा केलीआणीबाणी काळात देशातील महत्त्वाच्या लोकशाही मार्गाने चालणाऱ्या संघटनावर बंदी घालण्यात आली विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी, तसेच उद्योगपतीनाहि तुरुंगवास भोगावे लागला असल्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले.
लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या वीरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन त्यांना मानधन सुरू केले आज आपण सर्वांना सन्मानपत्र सुद्धा दिले . आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची काय समस्या असेल तरी ती लवकरात लवकर सोडविली जाईल असा विश्वासही खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी व्यक्त केला.
लोकशाही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक
जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड
लोकशाही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असून नागरिकांचे मूलभूत अधिकार 25 जून 1975 रोजी कमी करण्यात आले या घटनेला 25 जून रोजी 50 वर्षे पूर्ण झाल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निर्देशानुसार लोकशाही वाचवण्यासाठी सहभाग नोंदवलेल्या व्यक्तींचा सन्मान आणि गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
लोकशाही बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे . सन्माननिधी बाबत काही समस्या असल्यास त्या लवकरात लवकर जिल्हा प्रशासनामार्फत सोडविण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.
यावेळी आणीबाणी काळामध्ये तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
खासदार डॉ हेमंत सवरा आणि जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांच्या हस्ते आणीबाणी कालावधी मधील छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
आणीबाणी कालावधीमधील संकलित करण्यात आलेल्या छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉ. हेमंत सवरा आणि जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले.
छायाचित्राचे प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय यांचे कार्यालय प्रशासकीय इमारत– अ ,पहिला मजला, कक्ष क्रमांक 106 येथे आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन नागरिकांसाठी एक महिना खुले राहणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी आणीबाणी कालावधीतील छायाचित्र प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी केले.
जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये आणीबाणी कालावधी मधील लघु चित्रफितीचे प्रसारण करण्यात येणार आहे.