उपसंपादक – रणजित मस्के
| नंदुरबार
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारांवर वचक राहावा याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीतील एकूण सात जणांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. हद्दपार झालेले हे सर्व नंदुरबार तालुक्यातील आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी शहरासह जिल्ह्यात गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती घेत त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला. त्यात येथील तालुका पोलिस ठाणे हद्दीतील काही आरोपी त्यांची दहशत व वचक ठेवण्यासाठी बेकायदेशीररीत्या टोळी तयार करुन नियमितपणे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यापासून सामान्य नागरिकांच्या मालमत्ता व जीवितास धोका निर्माण झाल्याचे त्यांना आढळले. त्याप्रमाणे त्यांच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.
नंदुरबार तालुका पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या टोळीतील सात
जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यावरुन तालुका पोलिसांकडून त्यांच्या टोळीस हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाला. त्यात अर्जुन भिला पवार (वय २४) रा. चाकळे, सागर शिवनाथ पाडवी (वय १९) रा. चाकळे, लखन बापू भिल (वय २२), ज्ञानेश्वर वसंत मोरे (वय १९), न्हानभाऊ भगवान भिल (वय २५) तिघे रा. शनिमांडळ, किरण मंगलसिंग भिल (वय २५) व विपुल सुरेश कोळी (वय २३) दोघे रा. तिलाली यांचा समावेश आहे. हद्दपार झालेले सातही जण नंदुरबार जिल्ह्यात कुठेही दिसल्यास तत्काळ स्थानिक पोलिस ठाणे किंवा येथील पोलिस नियंत्रण कक्षाला कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे. दरम्यान, जिल्ह्यासह शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शांतता कायम ठेवावी. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे.