पालघर जिल्ह्यातील अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तासाठी 2 कोटी 70 लाखाचा निधी मंजूर – पालकमंत्री गणेश नाईक

उपसंपादक – मंगेश उईके
पालघर

दि. ७ : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील घरे ,शेती फळशेती, मत्स्य उत्पादने, पशु इत्यादीचे नुकसान झाल्यामुळे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नुकसान ग्रस्तासाठी निधीची आग्रही मागणी करून 2 कोटी 70 लाखाचा निधी मंजूर करून घेतला
पालघर जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे एप्रिल आणि मे २०२५ महिन्यांत मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली. ४ ते ६ एप्रिल, ६ व ७ मे आणि २३ ते २५ मे २०२५ या कालावधीमध्ये जिल्ह्यात एकूण १ हजार ७३२ घरे पूर्णतः तर ५ हजार ९७२ घरे अंशतः बाधित झाली आहेत. याशिवाय ६ झोपड्या पूर्णतः नष्ट झाल्या असून ९ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.
या आपत्तीग्रस्तांसाठी शासनाच्या महसूल व वन विभागाकडून रु. २ कोटी ५० लाख ६३ हजार ९२५ इतक्या निधीची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात दि. २ जून २०२५ रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावाची सविस्तर माहिती घेऊन पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडला. मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ निधी वितरित करण्याचे निर्देश दिले.
यानुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई यांचेमार्फत रु.२ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून तो संबंधित तहसिलदारांमार्फत बाधितांना वितरित करण्याचे काम सुरू आहे.
या आपत्तीमुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, शासनाकडून मिळणारी ही आर्थिक मदत त्यांच्या पुनर्वसनासाठी दिलासादायक ठरणार आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.
या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे दि. 4 व 5 एप्रिल 2025 रोजी पूर्णतः नष्ट झालेली घरे 1, अंशत: नुकसान झालेली घरे-339, नष्ट झालेल्या झोपड्या-1, नुकसान झालेले गोठे-3 एकूण निधी रु. 18 लाख 94 हजार 230 आणि दि. 6 ते 8 मे, 2025 पूर्णतः नष्ट झालेली घरे 3, अंशत: नुकसान झालेली घरे-2120, नष्ट झालेल्या झोपड्या-4, एकूण निधी रु. 1 कोटी 20 लाख 15 हजार 195, तसेच दि. 23 ते 25 मे, 2025 रोजी पूर्णतः नष्ट झालेली घरे 34, अंशत: नुकसान झालेली घरे-1393, नष्ट झालेल्या झोपड्या-5, नुकसान झालेले गोठे-3 एकूण निधी रु. 1 कोटी 11 लाख 54 हजार 500 असा आहे.