पालघर जिल्हयातील एकही घटकआरोग्यापासून वंचित राहणार नाह-आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे

उप संपादक -मंगेश उईके
पालघर,




दि.5:- पालघर जिल्ह्यातील शेवटच्या घटकांपर्यंत आयुष्मान भारत मिशन अंतर्गत योजनेचा लाभ मिळावा. जिल्हयातील एकही घटक आरोग्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्नशील रहावे, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आज येथे केले.
आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी खा.हेमंत सवरा, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा आरोग्य अधिकारी सतिश चौधरी. जिल्हा रूग्णालय, शासकीय रूग्णालय, खाजगी रूग्णालयांचे प्रमुख याबैठकीस उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ जिल्ह्यातील सर्व स्तरातील घटकांना, नागरीकांना मिळावा याकरीता “विकसित भारत संकल्प यात्रा २०२४” अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांची आढावा बैठक डॉ. शेटे यांनी घेतली.
यावेळी डॉ. शेटे यांनी जिल्हयातील सध्या स्थितीची माहिती जाणून घेतली. यामध्ये आयुष्यमान भारत अंतर्गत देण्यात येणारे ओळखपत्र अधिकाधिक लोकांना मिळावे, यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यातंर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरीकांना या योजनेचा लाभ मिळवा, यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. या जिल्हयातील एकही घटक आरोग्यापासून वंचित राहणार नाही तसेच आरोग्याच्या बाबतीत शासन कुठेही कमी पडणार नाही. जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मी स्वत: लक्ष देणार आहे, असेही ते म्हणाले.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शासनाच्या यादीवर असणाऱ्या ठराविक खाजगी रूग्णालयात रूग्णांवर इलाज केला जातो. मात्र, तेथील पॅकेज आणि उपचार पध्दती वाढल्याने रुग्ण उपचार घेण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे संबंधित घटकाच्या खिशाला कोणत्याही प्रकारची झळ बसणार नाही. त्यासाठी ही योजना तत्पर अधिकाधिक वाढवावी. पैशा अभावी कोणत्याही घटकाचा मृत्यू झाला नाही पाहिजे, असे निर्देश सर्व शासकीय रुग्णालय व खाजगी रुग्णालयांना दिले आहेत,असे डॉ.शेटे म्हणाले.