अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बाल विवाह केल्यास कठोर कार्यवाही करण्याचा जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखर यांचा इशारा..

उप संपादक – मंगेश उईके
पालघर दि.29:- अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी बाल विवाह करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे. बाल विवाह करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यासाठी बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 16 (1) नुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक व शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बाल विवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जिल्हयात बाल विवाह होणार नाहीत यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत. बाल विवाह रोखण्यासाठी गावामध्ये जनजागृती कार्यक्रम, बैठका, रॅली आणि माहिती पत्रके वाटप करण्यात आली आहेत. बाल विवाहमध्ये सहभागी होणारे धार्मिक गुरु,पंडीत, सेवा देणारे मंडपचे मालक, कॅटरींग, फोटो ग्राफर, लॉन्स मालक आणि वाजंत्री यांच्यावरही कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांना बाल विवाह रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1098 किंवा 112 यावर माहिती द्यावी.नागरिकांनी सतर्क राहून बाल विवाह रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

