पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील रस्ते आणि शासकीय इमारतीसाठी 1803 कोटी रुपयांचा निधी – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

0
Spread the love

प्रतिनिधी- मंगेश उईके

पालघर:-पालघर दि 8 : पालघर जिल्ह्यातील 21 रस्त्यांच्या कामासाठी 136 कोटी रुपये तसेच ठाणे जिल्ह्यातील 27 रस्त्यांच्या कामासाठी 1621 कोटी रुपये आणि शासकीय इमारतीसाठी 145 कोटी रुपयांचा निधी असे एकूण 52 कामासाठी 1803 कोटी रुपयांच्या निधीना मंजुरी देण्यात आली असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

पालघर व ठाणे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा वाडा तालुक्यातील कुडूस येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी पालकमंत्री श्री.चव्हाण बोलत होते.

यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार शांताराम मोरे, माजी आमदार अमित घोडा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील, उप अभियंता दत्ता गीते तसेच नागरिक उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य शासन विकासाची कामे करत असून विकासापासून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी राज्य शासन घेत आहे. भिवंडी- वाडा – मनोर रस्त्याच्या निर्मितीसाठी बऱ्याच अडचणी येत होत्या या अडचणीचा अभ्यास करून त्या अडचणी दूर करण्यात आल्या असून नागरिकांसाठी मजबूत आणि टिकाऊ सिमेंटचा रस्ता निर्माण करण्यात येणार आहे. सिमेंटच्या टिकाऊ रस्ता निर्मितीसाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

अंबाडी, शिरसाड रस्ता तसेच आवश्यक असलेल्या ठिकाणी उड्डाणपूल निर्माण करण्याची जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारली आहे. यापूर्वी या रस्त्यासाठी जो निधी आला त्या निधीचा उपयोग कशाप्रकारे करण्यात आला याची चौकशी करण्यात येत असून ही चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की सिमेंटचा रस्ता असल्यामुळे हा रस्ता मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारा असल्याने हा रस्ता खड्डे मुक्त असल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये रेल्वेची विविध कामे करण्यात आली आहेत . सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट